‘एक दिवस, बळीराजा सोबत’ या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि 15 जून, :- ‘एक दिवस, बळीराजा सोबत’ या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कळंब व राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देवून शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आदेश यंत्रणेला दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे समवेत उपजिल्हाधिकारी(रोहयो) संगीता राठोड, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार सुनिल चव्हाण (कळंब), रविंद्र कानडे (राळेगाव), सहायक गटविकास अधिकारी श्री. महाजन, तालुका कृषी अधिकारी श्री. भगत प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी कळंब तालुक्यातील तासलोट, मेटिखेडा व डोंगरखर्डा तसेच राळेगाव तालुक्यातील सावंगी(पेरका), बुजरी व वटखेड या गावांना भेट दिली. तासलोट येथे पाणी फाऊंडेशन वाटर कप अंतर्गत झालेल्या जलसंधारण कामाची त्यांनी पाहणी केली व तेथील उर्वरित क्षेत्रात जलसंधारणाची कामे मनरेगा अंतर्गत घेण्याच्या सुचना दिल्या. मेटिखेडा व बुजरी येथे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसाच्या नोंदी तातडीने घेण्याचे तसेच त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. याप्रसंगी लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी कळंब तहसील कार्यालय येथे सर्व तालुका विभाग प्रमुख यांची आढावा बैठक घेवून पोकरा, जलजिवन मिशन, घरकुल योजना, मातोश्री पांदन रस्ता, पोटखराब वर्ग-अ कामकाज, कर्ज वाटप बाबत आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषद उपअभियंता श्री. मानकर, मंडळ अधिकारी श्री. गरकल व श्री. राउत, तसेच सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी व तालुका स्तरीय यंत्रणेचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.