आगीत चार घरे जळून खाक ; बैलजोडीचा होरपळून मृत्यू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बाभूळगाव :- बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड खुर्द येथे बुधवारी (दि. ११) लागलेल्या आगीत चार घरे, एक गुरांचा गोठा जळून खाक झाला. बैलजोडीचा हाेरपळून मृत्यू झाला.
दोन मोटारसायकल, धान्य आदीसह संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले.
एका घराला आग लागल्यानंतर लागूनच असलेला गुरांचा गोठा पेटला. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केले. गजानन अजाबराव राऊत यांची एक लाख रुपये किमतीची बैलजोडीचा हाेरपळून मृत्यू झाला. सुधाकर पंजाबराव राऊत यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घराला लागूनच असलेले विष्णू उत्तमराव राऊत यांचे घरही आगीने आपल्या कवेत घेतले. यात त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले.
दोन मोटारसायकल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. शरद पंजाबराव राऊत यांच्या बकऱ्यांचा गोठा जळून खाक झाला. त्यातील जनावरांचा चारा व इतर साहित्य जळून खाक झाले. श्रावण शामराव शिवरकर यांचेही घर बेचिराख झाले. तहसीलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अवजाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत झाडे, ए.पी. पोपळकर, डॉ. अशोक धुर्वे, गोपाल कावलकर आदींनी घटनास्थळी पाहणी केली.