राज्यात बांधितापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक ; मृतांची संख्या वाढवते चिंता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 79 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 47 हजार 643 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 38 लाख 67 हजार 385 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत बुधवारी 13 जणांचा मृत्यू, 1 हजार 858 नवे कोरोनाबाधित
बुधवारी मुंबईत 1858 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत मुंबईत 1656 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या एकूण 1858 रग्णापैकी फक्त 233 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत. राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 364सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका झाला आहे.