राज्यातील ग्रामपंचायतीसाठी ठाकरे सरकारच्या मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी आहे.. तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमानाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्रणा बसवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे..
पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यासाठीच्या आवश्यक सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला..
राज्यात सध्या मंडळ स्तरावर 2119 स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली आहेत. त्यामार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. मात्र, पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने ग्रामपंचायत स्तरावर ही स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्याचा विचार सुरु आहे. सुरुवातीला 6 हजार ग्रामपंचायतींमध्ये ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भुसे यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले..
स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये महावेध प्रणाली अंतर्गत संकलित होणारी माहिती सुरक्षित राहील, यासाठी ‘स्कायमेट’ने व्यवस्था करावी. सध्या फळपीक विमा राबविण्यात येत असलेल्या क्षेत्रात अशी केंद्रे आहेत. पहिल्या टप्प्यात किमान एका मंडळातील दोन ग्रामपंचायतींमध्ये तरी ही केंद्रे उभारावीत, तसेच राज्यातील प्रत्येक विभागात ती सुरु करावीत, असे ‘स्कायमेट’च्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि कृषिविषयक सल्ला मिळण्याबाबतही ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. पीक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठीही ही केंद्रे उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येते.. सध्या महावेध प्रणालीमार्फत पावसाची आकडेवारी संकलित केली जाते. विमा कंपन्याही ही माहिती ‘स्कायमेट’कडून घेतात. त्यामुळे अधिकाधिक भागात ही केंद्रे कार्यान्वित झाल्यास, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान आदींची माहिती मिळू शकणार आहे.