यावर्षी विकास दर दोन अंकी राहील :- अमित शाह….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतातील जनतेला सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले प्रयत्न लोकोत्तर आहेत. जनसहभागातून कोविड परिस्थितीवर मात करणारा भारत हा जगातला एकमेव देश असून यावर्षी दोन अंकी विकास दर राहील, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ने आयोजित ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड’ समारंभात ते बोलत होते. माजी सरन्यायाधीश सदाशिवम आणि एचडीएफसी बॅंकेचे अध्यक्ष दीपक पारेख यावेळी उपस्थित होते. शहा म्हणाले, की कोविडची लढाई अनेक स्तरावर लढणे आवश्यक झाले होते. संसर्गाचा फैलावाचा वेग प्रचंड होता. पण देशातली कोटयावधी जनता पंतप्रधान मोदी यांच्या हाकेला ओ देत उपचार, प्राणवायू आणि लसीकरण या सर्व आघाडयांवर लढली. सद्यस्थितीत भारतातले लसीकरण बऱ्याच प्रमाणात आटोपले असल्याने आता पुढची लढाई सोपी ठरावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
पाच ट्रिलियन डॉलरचे स्वप्न
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू, असा आशावाद व्यक्त करत अमित शहा म्हणाले , भारत उत्पादनाचे जगातले प्रमुख ठिकाण ठरायला हवे. तुमच्यासारख्या कंपनी सेक्रेटरी वर्गासह प्रत्येक नागरिकाचे योगदान यात महत्त्वाचे असेल. भारतातल्या जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
नव्या परिस्थितीत कार्बन उत्सर्जन हाही एक प्रमुख विषय झाला असून कंपन्यांनी नफेखोरी करताना या विषयांकडेही लक्ष द्यायला हवे. ‘सीएसआर’अंतर्गत कंपन्या राष्ट्रनिर्माणास जो हातभार लावत आहेत, त्याबद्दलही त्यांनी आशावाद व्यक्त केला. दरम्यान, या वर्षीचा सर्वोत्तम कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा पुरस्कार अपोलो रुग्णालयाचे संस्थापक डॉ.प्रताप रेड्डी यांना देण्यात आला.