शिंदे गटांचे ६ मंत्र्यांचा पत्ता कट होणार…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पावसाळी अधिवेशनात ‘हनी ट्रॅप’चा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणात राज्यातील काही अधिकारी आणि नेत्यांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत सरकारवर चौफेर हल्ला चढवला.
नाशिक येथील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात सुमारे ७२ अधिकारी – नेते अडकल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या अग्रलेखातून नेमके किती आणि कोणते नेते या प्रकरणात अडकले? किती मंत्र्यांना नारळ देण्यात येणार? याची माहिती देण्यात आली. आजच्या अग्रलेखात केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘राज्याच्या राजकारणात रंगेल आणि रगेल लोक आली आहेत. एक मंत्री विधानसभेत बसून रमीचा डाव टाकतोय, दुसरा मंत्री लाखो रुपयांच्या नोटांच्या बॅगांचं प्रदर्शन करत सिगारेट फुंकतोय. तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीच्या हत्येचा आरोप पचवून, अगदी बिनधास्तपणे उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसतोय. चौथा मंत्री नाशिकच्या चर्चित हनी ट्रॅप प्रकरणातून स्वतःला सोडवण्याची धडपड करतोय, तर पाचवा मंत्री इतरांना अडकवण्याच्या नादात स्वतःच जाळ्यात सापडलाय. रम, रमी, रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झाला आहे, अन् कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवत आहे’, अशा शब्दांत टोकाची टिका आजच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशन महायुतीच्या नेत्यांच्या कारनामांमुळे चांगलंच गाजलं. पण या सगळ्यात ठळक ठरणारा मुद्दा म्हणजे हनी ट्रॅप. या ट्रॅपमध्ये बडे नेते मंडळी अडकल्याची माहिती आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे. संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय राठोड, दादा भुसे या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या पाचपैकी काहींना घरचा आहेर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत स्पष्ट सूचना काढल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हनी ट्रॅपबाबत विचारण्यात आले असता, ना हनी ना ट्रॅप असं उत्तर दिलं होतं. हनी ट्रॅप वगैरे असं काही नाही, असं ते म्हणाले होते. मात्र, गुप्तचरांनी दिलेल्या माहितीमुळे सरकारमध्ये हादरे बसण्याची शक्यता अग्रलेखातून वर्तवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळातील साधारण ७० ते ७५ टक्के मंत्र्यांचे आणि आमदारांचे चारित्र्य याच प्रकारचे असून, या सगळ्यांचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत असल्याचा घणाघात या अग्रलेखातून करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील हनी ट्रॅपबाबत मोठा खुलासा केला होता. २०२२ साली हनी ट्रॅपमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले असल्याचं वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्याला गांभिर्यानं घ्यावं लागेल, असं यातून स्पष्ट करण्यात आलं आहे.