आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, अख्खा महाराष्ट्र भावूक….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत साजरा करण्यात आला.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे काय काय म्हणाले?
आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, ‘झुकेगा नय साला’. पण आपले गद्दार म्हणतात, ‘कुछ बी बोलो, उठेगा नही साला’. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक सू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही. आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वत:ला मराठी आईची मुलं बोलू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.