राहुल गांधींनी पराभव स्वीकारला ; म्हणाले-‘विचारधारेची लढाई सुरुच राहणार…’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसची सत्ता आली.
आजच्या निकालांवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजपने मध्य प्रदेशात आपली सत्ता राखली तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोठा विजय मिळवला. या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर राहुल गांधी यांनी सर्वांचे आभार मानले. “मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरुच राहणार. मी तेलंगणातील जनतेचाही खूप आभारी आहे. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू,” अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, “काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल मी तेलंगणातील मतदारांचे आभार मानतो. ज्यांनी आम्हाला छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मतदान केले, त्या सर्वांचेही आभार मानतो. हे निवडणूक निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आले नाहीत, पण आम्हाला खात्री आहे की, आम्ही कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने परत येऊ. मी आमच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार मानतो. या पराभवाने खचून न जाता ‘INDIA’ आघाडीतील पक्षांसोबत आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करू,” अशी प्रतिक्रिया खर्गेंनी दिली.