“उद्धव ठाकरेंना कंटाळून शिंदे गट बाहेर पडला खरा पण.” गिरीश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिदे गट महाविकास आघाडी सरकारमधून उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडला. मात्र हे सगळं मिशन सोपं नव्हतं असं आता मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला हे मिशन सोपं नव्हतं.
४० आआमदार उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले. १७-१८ ची संख्या ५० पर्यंत येऊन पोहचली त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र हे सगळं मिशन सोपं नव्हतं असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे गिरीश महाजन यांनी?
आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता. कारण शिंदे गट बाहेर पडणं हे सोपं नव्हतं. अनेक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी होते. नाहीतर हे सगळं विचार करून पाहा सोपं आहे का? शिवसेनेसारख्या पक्षातून ४० लोकं बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडत आहेत. त्यांच्या सरकारला कंटाळून बाहेर पडले. मात्र हे लोक आले, एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठिशी होते. आम्हाला वाटलं होतं की काही खरं नाही मधेच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल? ४० लोकं जमा करणं सोपं नव्हतं. पण ते सोपं वाटत नव्हतं कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहहित आहे. मात्र सगळे आमच्या पाठिशी उभे राहिले असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
२१ जून २०२२ ला शिवसेनेत बंड
२१ जून २०२२ ला शिवसेनेत आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड पाहण्यास मिळालं. एकनाथ शिंदे हे सुरतला गेले, त्यांच्यासोबत काही आमदारही होते. ही संख्या सुरूवातीला १५, १८ अशी दाखवली जात होती. सगळेच्या सगळे नॉट रिचेबल. त्यानंतर ही संख्या २५, २८ अशी दाखवली जाऊ लागली. एकनाथ शिंदे हे जेव्हा बंड केलेल्या आमदारांसह गुवाहाटीला गेले तेव्हा ही संख्या ३५ च्याही पुढे गेली. या बंडाला जेव्हा तीन दिवस झाले तेव्हा ही संख्या ४० झाली. शिवसेनेतले ५६ आमदार २०१९ च्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यापैकी ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही घटना पहिल्यांदा घडली.
२९ जूनला उद्धव ठाकरेंचा राजीनामा
या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे स्पष्ट झालं होतं. घडलंही तसंच. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्राला आणि निघून गेलेल्या आमदारांना भाविक साथ घातली. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्ह करत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर तातडीने वर्षा हे निवासस्थान सोडून त्यांनी राज्यपालांकडे जात राजीनामा दिला. यामुळे राज्यात अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
३० जूनला नवं सरकार
३० जूनला राज्यात नवं सरकार अस्तित्त्वात आलं. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार कुणीही पक्ष सोडला नाही. उलट आम्हीच खरे शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे आहोत असं म्हणून त्यांनी पक्ष नेतृत्वालाच म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यामुळे शिवसेना कधी नव्हे तेवढी दुभंगली. भाजपाने ही संधी साधली आणि एकनाथ शिंदेंसोबत जात या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
या सगळ्या घडामोडी ९ दिवसात घडल्या हे महाराष्ट्राने पाहिलं पण हे मिशन सोपं नव्हतं अशी कबुली आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.