“राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे” ; शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली ‘मन की बात’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याच्या राजकारणात अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे नेते महामोर्चा काढण्यावर ठाम आहेत. तसेच सीमावादाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान यांवरून शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे.
यातच मनसे कुणासोबत युती करणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असते. यातच शिंदे गटाच्या नेत्याने राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यापूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार रत्नागिरीत आले. यावेळी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मनसेने कोणासोबत जायचे हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांनी कुणासोबत जावे हा त्यांचा निर्णय आहे. पण ते आमच्यासोबत आले तर वेलकम. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही, असे सत्तार म्हणाले.
कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही
महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चा काढला जाणार आहे. त्यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, कितीही लोक आले तरी सरकार कधी घाबरत नाही. कायदा सुव्यवस्था कायम राहील, याची विरोधकांनी खबरदारी घ्यावी. शेवटी काही नियम असतात, काही धोरण असतात त्याचे पालन करावे आणि मोर्चा काढावा. आम्ही कुणाला अडवले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
दरम्यान, मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही ‘मविआ’ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन केले जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.