रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फार मोठा अवधी शिल्लक राहिलेला नाही.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी देखील हळूहळू केली जात आहे. त्यातच आता कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. याला कारण ठरलंय बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं वक्तव्य.
भाजप कोकणातली लोकसभेची जागा शिंदे गटासाठी सोडणार?
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा उमेदवार रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातून उभा राहू शकतो, असं वक्तव्य दीपक केसरकार यांनी केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आमनेसामने येणार का? तसेच मुख्य बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाल्यास भाजप ही जागा शिंदे गटासाठी सोडणार का? अशी चर्चा कोकणातल्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील विद्यमान खासदार असून ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.
मिशन लोकसभा अंतर्गत भाजपचं रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर लक्ष
तत्पूर्वी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली आहे. त्यानुसार 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. असून यामध्ये कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासह बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा देखील समावेश आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त केला होता.रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे भाजपने या दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करत यापूर्वीच कामाला सुरुवात देखील केली आहे. अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात खासदार नेमका कोणाचा होणार? याच्या चर्चा आतापासूनच सुरु झाली आहेत.