नेताजी च्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात तृणमुल-भाजपचे कार्यकर्ते भिडले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भाटपारा :- पश्चिम बंगालमधील भाटपारामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे.
या कार्यक्रमादरम्यान तृणमुल काँग्रेस (TMC) आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवल्यानं वातावरण तापलं आहे. पोलिसांनी प्रयत्न करून देखील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नव्हते. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कोलकाता जवळील भाटपारा येथे भाजप आणि टीएमसी समर्थकांमध्ये चकमक झाली. बराकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांच्यावर कथित दगडफेक करण्यात आल्यानंतर ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितलं की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अर्जुन सिंह आले होते. त्यावेळी उपस्थित भाजप आणि तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांवर चालून गेले. त्यानंतर मोठा संघर्ष निर्माण झाला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यात झालेल्या संघर्षात पोलिसांच्या वाहनासह दोन कारची तोडफोड करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस सहआयुक्त ध्रुबा ज्योती डे यांनी सांगितलं की, भाजप खासदाराची सुटका करून त्यांना त्यांच्या निवासस्थानी सुखरूप पाठवण्यात आलं आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेनंतर भाजप खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, आमचे आमदार पवन सिंह आज सकाळी साडेदहा वाजता नेताजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले तेव्हा तृणमुलच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. गोळ्या झाडल्या, विटा फेकल्या. त्यानंतर मी पोहोचल्यावर त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. माझी गाडी फोडण्यात आली. हे सगळं पोलिसांसमोर घडल्याचा आरोपही त्यांनी केला.