“मी नुसत्या बढ़ाया मारत नाही , शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमी वाकयुद्ध रंगताना पहायला मिळतं. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून शिवसेना आणि राणे यांच्यात पुन्हा कलगीतुरा पहायला मिळत आहे.
नारायण राणे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या एका सभेत शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे.
शिवसेनेने यावं आणि आमच्या ताब्यातील नगरपरिषदा घेऊन जाव्यात, असं व्हायला आम्ही काय डोळे मिटून चुपचाप बसलोय का?,असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. चारही नगरपरिषदा आमच्याकडे आहेत आणि आमच्याकडेच राहणार, शिवसेनेची ताकद काय?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडवणारच, असा विश्वास देखील राणेंंनी व्यक्त केला आहे. या नुसत्या बढाया मारत नसून आमची तेवढी ताकद आहे. विमानतळाचं काम आम्ही केलं. रस्ता चौपदरीकरणाचं काम आम्ही केलं. या कामाशी तुमचा काय संबंध? तुम्ही कधी होतात?, असा प्रश्नांचा भडीमार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.
दरम्यान, विमानतळाच्या कामाचं भूमीपूजन आम्ही केलं. त्यालाही यांनीच विरोध केला होता. आता विमानतळ तयार झालंय तर आता हे म्हणतात हे आम्हीच तयार केलंय, असं म्हणत त्यांनी मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.