मुंबई काँग्रेस वर दिल्लीचे “हायकमांड” नाराज…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेसच्या स्थापन दिनाचे निमित्त पुढे करीत राज्यातील आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांची सभा घेण्याची मुंबई काँग्रेसची रणनीती फसली आहे.
पक्षातील वाद, ठाकरे सरकारचे दुर्लक्ष आणि न्यायालयातील याचिकेमुळे राहुल यांची सभा पुढे ढकलण्याचा निर्णय ‘हायकमांड’ घेतला आहे.
यानंतर राहुल यांची सभा होईल, याची शक्यता नसल्याचेही सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या सभेच्यानिमित्ताने मुंबई काँग्रेस प्रदेश काँग्रेस आणि ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांमधील वाद पुन्हा एकदा ‘हायकमांड’च्या डोळ्यावर आले आहेत.
मागील काही निवडणुकांत सतत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर गेल्या एक-सव्वा वर्षात काँग्रेसची ताकद वाढत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारमधील सहभागामुळे यापुढील काळात पक्ष पुन्हा उभा राहण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष स्थापनेचे निमित्त करून महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवाजी पार्कवर २८ डिसेंबरला राहुल गांधी यांची सभा घेण्याचे मुंबई काँग्रेसने निश्चित केले होते. त्यासाठी राज्य सरकारकडे परवानगीही मागितली होती; त्यावर निर्णय न झाल्याने मुंबई काँग्रेस उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरून दिल्लीतील पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज झाल्याचेही बोलले जात आहे. या नेत्यांच्या वादात राहुल यांची सभा तूर्तास रद्द करण्याची भूमिका वरिष्ठ नेतृत्वाने घेतली.
सभेच्या नियोजनानंतर तिची परवानगी आणि याचिका दाखल करण्याबाबत मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेश समितीच्या नेत्यांना कल्पना दिली नसल्याची चर्चा आहे.