“देवेंद्र फडणवीसांना “त्या” प्रकरणात अटकेची भीती वाटत होती” ; संजय राऊत यांनी सगळं सांगितलं..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या चार नेत्यांना अटक करण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट केला.
यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप
“मला अटक होईल या भीतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला. एकनाथ शिंदे यांनाही अटकेची भीती आणली. एकनाथ शिंदे यांच्यावर मोदी सरकारने दबाव आणला होता,ते चाळीस आमदार घेऊन या नाहीतर अटक करु असं त्यांना सांगितलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी आज केला.
संजय राऊत म्हणाले, प्रविण दरेकर यांच्यावर मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप आहे, बेकायदेशीरपणे कर्ज वितरणाचा त्यांच्यावर आरोप आहे याची चौकशी सुरू होती.लाड यांच्यावर अनेक प्रकारची गुन्हे आहेत. डरपोक लोक आहेत. स्वत:ची अटक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. गिरीश महाजन यांच्यावर मोठे गुन्हे आहेत. केंद्रातील सरकार शंभर टक्के बदलत आहे, असंही राऊत म्हणाले.
“केंद्रातील सरकार बदलणार आहे, पुन्हा चौकशीसाठी फाईल बाहेर निघतील. या सगळ्यांची पुन्हा कायदेशीर चौकशी होईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
नारायण राणेंवर टीका
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना राऊत म्हणाले, बोलू द्या त्यांना काय त्यांचे वय झाले आहे, ते आता जे टोप घालत आहेत त्या टोपची केस देखील पिकले आहेत,’एवढे वय झाले आहे त्यांचे, आम्हाला दादागिरी सांगू नका. कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केला आहे, असा टोलाही लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कटकारस्थान मविआ सरकारने आखलं होतं, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी हल्लीच केलाय. माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात खटले उभे करून त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने आखला होता. एवढंच नाही तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या आमदारांना फोडून आपल्याकडे वळवण्याचा डावही आखण्यात आला होता, असा सनसनाटी गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे…