“नवनीत राणांच्या विजयासाठी…” उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती येथे शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा, भाजपा नेत्या चित्रा वाघ, खासदार डॉ.अनिल बोंडे, रवी राणा यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी घड्याळाचे बटण दाबा असे म्हणाले. मात्र, चूक लक्षात येताच अजित पवार यांनी चूक सुधारत सारवासारव केली.
अजित पवार काय म्हणाले?
“अमरावती जिल्हा हा संत आणि महापुरुषांचा जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी येथे पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या जिल्ह्यात उद्योग, रोजगार निर्मीती करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. अमरावती जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्यासाठी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयासाठी घड्याळाच्या.. कमळाच्या… कारण महायुतीमध्ये घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण चिन्ह आहेत. आता मी दोन सभा घेतल्या, त्यामुळे घड्याळाचे नाव तोंडात आले. मात्र, हे सर्व चिन्ह एकमेकांना साथ देणारे चिन्ह आहेत. हे चिन्ह महाराष्ट्रात जिथे कुठे असतील त्याचे बटण दाबले की त्याचे मतदान थेट नरेंद्र मोदींना मिळणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “अमरावती मतदारसंघात विरोधकांची काय परिस्थिती आहे, या खोलात मी जात नाही. मी आरोप प्रत्यारोप करणारा कार्यकर्ता नाही. विकासाच्या मुद्यांवर बोलणारा कार्यकर्ता आहे. आज देशामध्ये विकासपुरुष या नात्याने नरेंद्र मोदींकडे पाहिले जाते. आपल्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी पुन्हा एकदा या देशाच्या १३५ कोटी जनतेची सूत्र मोदींकडे देण्याची गरज आहे”, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
“२०१४ च्या निवडणुकीचा निकाल यायच्या आधी भारतीय जनता पक्षाला विधानसभेत आमच्या पक्षाने बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले होते की काही दिवसांनी आपल्यालाही त्या सरकारमध्ये जायचे आहे. पण कुठे काय अडले माहिती नाही. त्यावेळी आम्हाला आदेश यायचे आणि आम्ही अंमलबजावणी करायचो. मी एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आजही पहाटे सहाला उठून कामाला सुरुवात करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील १८ ते २० तास काम करतात”, असे अजित पवार म्हणाले.
“काही महिन्यांपूर्वी रशिया आणि युक्रेनचे युद्ध झाले होते. युक्रेनमध्ये आपले काही विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेत होते. अचानक युद्ध पेटले. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डायरेक्ट व्लादिमीर पुतिन यांना फोन केला आणि सांगितले माझ्या मुलांना, मुलींना भारतात आणायचे आहे, युद्ध थांबले पाहिजे. त्यावेळी आपले विमाने जायचे आणि विद्यार्थ्यांना घेऊन यायचे. त्यावेळी युद्ध थांबले होते. एवढी ताकद कुणामध्ये आहे? याआधी कधी असे घडले का?”, असेही अजित पवार म्हणाले.