सरकारमध्ये संधी मिळत नाही काँग्रेसचे मंत्री नाराज.
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सरकार शिवसेनेचे सरकार असल्याची भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. आता तर काँग्रेसचे मंत्रीच नाराज असून, याचसाठी गुरुवारी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याची मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या बैठकीमध्ये सरकारमध्ये नेमकी काँग्रेसची भूमिका काय यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते.सध्या राज्यात करोनाचे संकट आहे. मात्र या संकटाच्या काळात काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणत्याच निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले नसल्याची खंत सध्या काँग्रेसच्या मंत्र्यांना आहे. एवढेच नाही तर जितके महत्त्व सध्या या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आहे तितके महत्त्व काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळत नसल्याचे काहींनी खासगीत बोलताना सांगितले.
त्यामुळेच काँग्रेसचे मंत्री आपली सरकारमध्ये नेमकी भूमिका काय यावर चर्चा करण्यासाठी भेटले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वाढलेले वजन हे देखील काँग्रेससाठी डोकेदुखीचे ठरत असून, याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.
इतकेच नाही तर काँग्रेसच्या मंत्र्यांची नाराजी ही अधिकारी वर्गामुळे देखील वाढली आहे. मुख्य सचिव तसेच त्या त्या विभागाचे प्रधान सचिव हे मंत्र्यांना न विचारताच निर्णय घेतात असे देखील एका मंत्र्याने सांगितले. एवढेच नाही तर करोनाच्या काळात काही निर्णय परस्पर घेतले गेले याची साधी कल्पना देखील मंत्र्यांना मिळत नव्हती.
दरम्यान राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्तीनंतर सलग ९ महिने राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना विश्वासात न घेताच प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असे कोणतेच वाद झाले नसल्याचे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झाले. त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणे अपेक्षित आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू.
बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री