पाच बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद कराप्रधान मुख्य वनसंरक्षक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला
लागून असलेल्या कोलारा परिसरात पाच गावकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केटी-१ या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ताडोबा प्रशासनाला दिले आहेत.
ताडोबा प्रकल्पालगत चिमूर या तालुक्याच्या ठिकाणाहून १० कि.मी. अंतरावर कोलारा गाव आहे. या गावातील रहिवासी राजेश दडमल (५०) यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडला. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात बालाजी वाघमारे रा. कोलारा, त्यानंतर एप्रिल महिन्यात यमुनाबाई गायकवाडम् रा. सातारा (कोलारा), मे महिन्यात लीलाबाई जीवतोडे रा. कोलारा आणि दोन दिवसांपूर्वी ४ जून रोजी राज्यपाल नागोसे रा. ब्राम्हणगांव (कोलारा), असे मागील तीन महिन्यांत, एकाच परिसरातील पाच व्यक्तींचे केटी-१ या वाघाने बळी घेतले आहेत. दरम्यान, वनविभागाने शोधमोहीम राबवून बळी घेणाऱ्या वाघाचा शोध घेण्यात आला. विशेष म्हणजे, या भागात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपच्या अहवालानुसार या पाचही व्यक्तींचा बळी घेणारा एकच वाघ आहे व तो केटी-१ असल्याने निष्पन्न झाले. त्यामुळे वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांना दिले आहेत. तसेच वाघाला जेरबंद करतेवेळी मानवी संपर्काचा ठसा उमटणार नाही यांची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. हे आदेश ३० जुलै २०२० पर्यंत वैध राहणार आहे. विशेष म्हणजे, या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. वाघ वन विभाग जेरबंद करीत नसेल तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो असा इशारा दिल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठवला. त्यानंतर हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.