भाजप मंत्री स्थानिक आमदारांना त्रास देतात, शिंदे गटाचा गंभीर आरोप…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी समसमान जागावाटपाची मागणी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी थेट भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
भाजप मंत्री स्थानिक आमदारांना त्रास देतात
विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघात माझ्या मुलाच्या विरोधात भाजपने युती असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेला उघडपणे मतदान केलं. 2019 मध्ये युती असतानाही भाजपने मला पाडलं, हे वास्तव आहे. आता देखील युती असतानाही आम्ही मोठा निर्णय घेत भाजपसोबत आलो आणि मंत्रिमंडळ स्थापन केलं. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो, पण पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा, असं म्हणत रामदास कदमांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
रविंद्र चव्हाणांवर रामदास कदमांचा गंभीर आरोप
युती असताना आम्ही इतका मोठा निर्णय घेतला. विश्वासानं भाजपासोबत आलो आणि मंत्रिमंडळ बनलं. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्थानिक आमदारांना भूमिपुजन आणि लोकार्पणात बाजूला ठेवत त्यांना त्रास देत आहेत, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपचं घृणास्पद राजकारण सुरु आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेना-भाजप यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपकडून प्रयत्न
लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होती, असं म्हणत रामदास कदमांनी मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. कदम म्हणाले की. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी-शाहांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही भाजपसोबत आलो आहोत. आमचा विश्वासघात होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. सीटींग जागांवरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी तालुक्यात, मतदारसंघात जात आहेत, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सींटिंग जागांवर जबरदस्तीचा प्रयत्न सुरु आहे.