संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांचे अप्रत्यक्ष कान टोचले ; ‘वंचित’च्या अटी शर्थींनी महाविकास आघाडी हैराण..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्नांची शर्थ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीकडून येणाऱ्या सातत्यपूर्ण अटी शर्थींमुळे जागावाटप करताना अक्षरशः हैराण होण्याची वेळ आली आहे.
प्रत्येकवेळी बदलती मागणी आणि कोणतीही स्पष्ट न केलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील चर्चेची गाडी पुढे काही गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (7 मार्च) अप्रत्यक्षरीत्या प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरून त्यांचे कान टोचल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) काल (6 मार्च) महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सामील झाले होते. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपावरती चर्चा केली. मात्र, या बैठकीमधून प्रकाश आंबेडकर उठून गेल्याची चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांचे अप्रत्यक्ष कान टोचले.
तेव्हा देखील आमच्या मनासारखं झालं नाही
संजय राऊत म्हणाले की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे काही होत नसतं. आम्ही युतीमध्ये होतो, तेव्हा देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, शिवसेनेकडून अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडल्या गेल्या आहेत.
दरम्यान त्यांनी पुढे सांगितले की प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम सुरू असून काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होणार आहे. मात्र, काही घडलंच नाही हे सांगणं त्यामुळे बरोबर नाही. वंचितच्या बाबतीत आम्ही चर्चेमध्ये फार पुढे गेलो असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे मायावती करत आहेत त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या भाजपला मदत होईल असं काहीही करणार नाहीत. त्यांना संविधानाचे रक्षण करायचं असून आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे, म्हणून आम्ही एकत्र आल्याचे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऑनलाईन लॉटरीवरून फडणवीसांना टोला
दरम्यान संजय राऊत यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तोफ डागत ऑनलाईन लॉटरीवरून जाब विचारला आहे. दरम्यान, या पत्रावरून त्यांनी सांगितले की वारंवार मी हे पत्र लिहितो. आमदार गोळीबार करत आहेत. लुटमार, बलात्कार, हत्या सुरू आहेत आणि गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत. नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरात ड्रग्ज सापडत आहेत. त्यामुळे सरकार काय करत आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
ऑनलाईन लॉटरीचा मोठा फटका तरुणांना बसला असून ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता मिळत आहे. गृहमंत्र्यांना विचारलं की, ते काहीही बोलतात असे म्हणतात. मी त्यांना पुरावे देईन असेही ते म्हणाले.
त्यांची केस आमच्याकडून संपली
दुसरीकडे, शिंदे गटातील रामदास कदम यांनी भाजपवर तोफ डागली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सुद्धा जागावाटपावरून अंतर्गत यादवी सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी या केसविषयी आम्हाला काही बोलायचं नाही, असं म्हणत प्रतिक्रिया दिली नाही. केसाने गळा कापू नका, हे कोणाला सांगायचं आहे ते माहित नाही, पण त्यांची केस आमच्याकडून संपल्याचा संजय राऊत म्हणाले. उद्याच्या निवडणुकीत त्यांच्या केसची फाईल जनता बंद करणार आहे, ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर काही बोलू शकत नसल्याचे सांगत त्यांनी त्यांनी त्यांचं पहावं असं संजय राऊत म्हणाले.