मराठा आंदोलक आक्रमक, चिखलीकरांचा ताफा अडवला ; आदर्श घोटाळ्याचीही एसआयटी लावण्याची केली मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, यावरून मराठा समाजात मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत असून, याच रोषाचा सामना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना (Pratap Patil Chikhalikar) करावा लागला आहे. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना चिखलीकरांना मराठा आंदोलकांनी अडवत जाब विचारला. तसेच, जरांगे यांची कशामुळे एसआयटी चौकशी करता असे म्हणत आदर्श घोटाळ्याची एसआयटी लावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या चौकशीसंदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आल्यानंतर राज्यभरात मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चांगेफळ या गावात लग्न सोहळ्यासाठी आले असता, मराठा समाजाच्या तरुणांनी चिखलीकरांना अडवत आदर्श घोटाळ्याची एसआयटी लावा अशी मागणी केली आहे. तर, सामान्य गरीब जरांगे पाटील यांची कशामुळे एसआयटी चौकशी करता असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी तरुणांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
चिखलीकरांना काढता पाय घेतला…
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात केली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष यांनी एसआयटीची घोषणा केली. या निर्णयावरून राज्यभरामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचे पडसाद देखील उमटायला सुरुवात झाली आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चांगेफळ या गावात लग्न सोहळ्यासाठी आले असता, मराठा समाजाच्या तरुणांनी चिखलीकरांना थांबवत सामान्य मराठा तरुणाची एसआयटी का लावता असा जाब विचारला. आदर्श घोटाळ्याची एसआयटी लावा असा प्रश्न विचारला व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चिखलीकरांना काढता पाय घ्यावा लागला.
मला कधीही अटक होऊ शकते…
मनोज जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असे असतानाच, ‘आपल्याला कधीही अटक होऊ शकते, याबाबतचा अहवाल देखील तयार झाला असल्याचा’ दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मनोज जरांगे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे.