लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार गटातील आमदार शरद पवारांकडे येतील ; रोहित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार गटातील काही आमदार भाजपच्या चिन्हासोबत लढण्यासाठी इच्छूक आहेत मात्र अजित पवार गटातील काही आमदार लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांकडे येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवारांनी आज हडपसर परिसरातील विकास कामांची पाहणी केली . त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. त्यासोबतच त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
‘राज्यातलं राजकारण पाहून राज्यातली जनता डिस्टर्ब झाली आहे. राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कलुषित करण्यात येत आहे. हे वातावरण चांगलं करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही लढा देतो आहोत. अजित पवारांच्या पाठीशी गेलेले अनेक आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्याचा विचार करताना दिसत आहेत. याचं प्रतिनिधीत्व अजित पवारांबरोबर असलेले नेते करत आहेत, असं चित्र दिसत आहे. काही आमदार भाजपच्या चिन्हासोबत लढण्यासाठी इच्छूक आहे आणि काही आमदार लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवारांकडे येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे आणि महत्वाचं म्हणजे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल’, असंही ते म्हणाले.
लोकनेता बनणं सोपं नसतं!
‘बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, लोकनेता बनणं सोपं नसतं त्याला लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि तो पवार साहेबांनी संपादन केला आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आजही पवारांसोबत आहेत. शिवाय महाराष्ट्रात नवीन इन्वेस्टमेंट येत नाही जर या नवीन युवकांना रोजगार द्यायचे असतील तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये आणावी लागेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अमोल कोल्हेंनी सामान्यांचा आवाज उठवला!
अमोल कोल्हेंसंदर्भात ते म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटी नेत्याने सामान्यांचे प्रश्न मांडले नाहीत मात्र अमोल कोल्हेंनी लोकसभेत नागरिकांचा प्रश्नांवर चांगला आवाज उठवला आहे. अमोल कोल्हे प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात आणि शिरूर लोकसभेतील लोकांचा विश्वास हा अमोल कोल्हेंवर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सामान्य लोकांचे राज्य नाही गुंडांचे राज्य!
ड्रग्स कारवाई संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ससून हॉस्पिटलमध्ये ही आधी अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यात काय समोर आलं. त्यात असं म्हटलं जातं की एका वरिष्ठ नेत्याचा फोन पोलिसांना आला होता. एकच अधिकारी आहे की अनेक अधिकारी आहेत हे शोधावं लागेल. हे सामान्य लोकांचे राज्य राहिलं नाही गुंडांचे राज्य झाले आहे, असा आरोप रोहित पवारांनी ड्रग्स प्रकरणावरुन केले आहेत.