मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी व्यक्त केली शंका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य सरकारने विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. असं असताना हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा ठराव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण कोर्टात टिकण्यावर प्रश्नचिन्ह
मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने मराठा आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात पुढे टिकलं नाही. पुन्हा तशाच्या पद्धतीने हे आरक्षण मंजूर करून घेतलं आहे. कायदेतज्ज्ञ बापट यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आज त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
”मराठा आरक्षणाबाबत माझ्याही मनात शंका”
”कायदेशीर सल्लागार त्यांच्या मनात या आरक्षणाबाबत शंका आहे. माझ्याही मनात याबाबत शंका आहे. हा प्रश्न सुटला तर मला आनंद आहे. पण, जे विधेयक आता पास केलं. तसंच, एक विधेयक 2014 ला पास झालं होतं, ते हायकोर्टात फेल गेलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधेयक मांडलं जे, उच्च न्यायालयात मंजूर झालं, पण सर्वोच्च न्यायालयात नामंजूर ठरलं. आता पुन्हा एकदा हेचं बिल सरकारने मंजूर केलं आहे. या निमित्ताने हा प्रश्न सुटत असेल, तर चांगलं आहे, यासाठी हे विधेयक सर्वांनी एकमताने मंजूर केलं”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हा सर्व ड्राफ्ट बघावा लागेल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बघावा लागेल, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्वांचा अभ्यास करुनच काही सांगता येईल, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
‘आमदार सोडून जाणं, चिंता करण्यासारखी गोष्ट नाही’
आगामी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, लोकसभेला बारामतीबाबत आमच्या विरोधकांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही. आमदार सोडून जाणं, हे मला चिंता करण्यासारखी गोष्ट वाटत नाही. ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना असंच झालं होतं. मी परदेशात असताना 59 पैकी 5 सोडून सर्व आमदार सोडून गेले होते. पण, नंतरच्या निवडणुकीत 95 टक्के आमदार पराभूत झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होणार हे नक्की’, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.