‘आता मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं”, लोणावळ्यातली चर्चा फिस्कटली; मराठा आंदोलकांची मुंबईकडे कूच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लोणावळा :- मराठा आरक्षणाचा मोर्चा लोणावळ्यापर्यंत पोहोचला असून अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबतची चर्चा फिस्कटल्यामुळे मोर्चाने मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना साद घालत त्यांनी चर्चेसाठी यावं, असं म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तांचं एक शिष्टमंडळ आलेलं होतं. जरांगे पाटलांनी आंदोलकांना मुंबईच्या दिशेने वाहनं उभी करण्याच्या सूचना देऊन शिष्टमंडळासोबत चर्चा केली.
चर्चा आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचं एक मोठं शिष्टमंडळ सायंकाळपर्यंत भेटण्यासाठी येणार आहे. सध्याच्या चर्चेत अधिकाऱ्यांनी केवळ माहिती दिली असून त्यात कसलीही चर्चा झालेली नाही.
जरांगे पुढे म्हणाले, मुंबईला जायचं म्हणजे सरकारचेही हाल आहेत आणि आमचेही हाल आहेत. आम्हाला मुंबईला जाण्यात रस नसून तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने आता याला-त्याला पाठवण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेसाठी यावं आणि फायनल तोडगा काढावा.
”राज्य शांततेत कसं हाताळायचं हे सरकारचं काम आहे, आमचं काम नाही. अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बंद दाडाआड चर्चा झालेली नाही. मला जेवायचं होतं आणि अधिकारीही लोकांसमोर बोलायला घाबरत होते, त्यामुळे आतमध्ये बसून चर्चा केली” असं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, आम्ही आझाद मैदानावरच आंदोलन करणार असून तिथे स्टेज बनवण्याचं काम सुरु आहे, असं जरांगेंनी पत्रकारांना सांगितलं. दुसरीकडे आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीससुद्धा धाडली आहे. त्यामुळे नेमकं आंदोलन कुठे होणार, याबाबत स्पष्टता नाहीये.