“देशात रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळा तर.”, राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मेघालय :- २२ जानेवारीच्या दिवशी राम मंदिरात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या सोहळ्याला रामभक्तांची आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसंच लाखो लोकांनी हा सोहळा लाईव्हही पाहिला. या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.
मात्र हा भाजपाचा कार्यक्रम आहे असं म्हणत त्यांनी यावर बहिष्कार घातला. याबाबत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
देशात ‘राम लहर’ अर्थात रामभक्तीची लाट आली आहे. त्यासाठी तुम्ही कसे तयार आहात असं विचारलं असता, राहुल गांधी यांनी “रामभक्तीची लाट वगैरे काहीही नाही प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नरेंद्र मोदींचा शो होता. नरेंद्र मोदी यांनी फंक्शन केलं. ते सगळं ठीक आहे. आमच्याकडे देशाला बळ देणाऱ्या पाच योजना आहेत. आम्ही त्या लोकांसमोर ठेवतो आहोत.” असं उत्तर दिलं आहे.
अयोध्येला जाणार का?
अयोध्येला जाणार का? असं विचारलं असता राहुल गांधी म्हणाले मी भारत जोडो न्याय यात्रेत आहे. तसंच पक्षाने जो मार्ग ठरवून दिला आहे त्यात अयोध्या येत नाही. भारत जोडो न्याय यात्रेच्या मागे न्यायाचा विचार आहे. युवकांना न्याय, स्त्रियांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, कामागारांना न्याय आणि समान भागिदारी हे पाच स्तंभ देशाला शक्ती देतील. पुढचा दीड महिना आम्ही हे स्तंभच देशासमोर ठेवणार आहोत असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीकडे ६० टक्के मतं
आम्ही विचारांची लढाई लढतो आहोत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि भाजपा, संघाचा विचार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे. इंडिया आघाडीकडे आज घडीला ६० टक्के मतं आहेत. सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरीही मी माझा लढा सुरु ठेवणार असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.