महायुतीच्या मेळाव्यात दादा भुसे यांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका, म्हणाले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोक सभा 2024 च्या निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागले आहेत. लोकसभेसाठी सर्वच पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपा संदर्भातील बैठकांना होऊ लागल्या आहेत.
परंतु, अद्यापही जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत कोणताही तोडगा निघालेला नाही. आगामी लोकसभेसाठीच्या मेळाव्यांना आता सुरुवात झाली आहे. महायुतीमधील सर्व प्रतिनिधी यासाठी जोराने कामाला लागले आहेत. तर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा कशा विजयी करायच्या? यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरू झाली आहे. नाशिकमध्ये आज (ता. 14 जानेवारी) महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे आणि अन्य प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी भूसेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. या घोटाळ्याबाबतचे पुरावे राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवले आहेत. पण याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यामुळे या प्रकरणावरून राऊतांनी कायमच भूसेंवर निशाणा साधला आहे. त्याचमुळे की काय पण आता दादा भूसे यांनी संजय राऊतांवर टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोक रोज सकाळी 8-9 ला उठले की, टिव्हीसमोर येणार वाकडी मान करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार, अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
तर, मोदी साहेबांसमोर कोणी आहे का? दुसरं कोणी दिसत पण नाही. मोदींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मी स्वतः उमेदवार असे समजून काम करा. युवा महोत्सवात मोदीजी येऊन, सर्वांनी जबाबदाऱ्या चोख पार पाडल्या त्याबद्दल आभार मानतो. त्यामुळे काही लोक टिव्हीवर येऊन फक्त चमकोगिरीचे काम करतात, आता याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, असे म्हणत राऊतांवर हल्लाबोल केला. महायुतीच्या मेळाव्यातून भूसेंनी नाशिकमधील आरपीआयचे नेते प्रकाश लोंढे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले आहे. “लोंढे साहेब काही घरातल्या गोष्टी आपण घरातच बोलू शकतो, असे ते म्हणाले. आठवले साहेब मोदींचे आवडते नेते आहेत, त्यांना बोलावून मंत्रिपद दिले जाते, आपल्यात काही असेल तर बोलून मिटवून घेऊ. बॅनरवर फोटो कोणाचा हा प्रोटोकॉलवरून आला आहे,” असे म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नाशिकमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळही उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आपल्या भाषणातून टोलेबाजी करत आपण सर्व एकत्र राहण्याची शपथ घेऊ असे म्हटले आहे. महायुतीच्या मेळाव्यात नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला शेवटी बोलायला आवडत नाही. कारण सगळे कंटाळलेले असतात. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मोदी साहेबांचा आध्यात्मावर विश्वास आहे. उद्या मकर संक्रांत आहे, आपल्याला आता गोड बोलायचे आहे. आपण तिळगुळ देऊन जे गोड तोंड करू, ते कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ घेऊ. तर, माझ्याकडे अजितदादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. 45 खासदार का? 48 पैकी 48 का नको? उरलेले तीन धाकधूक होतील. आपण सर्व खासदार निवडून आणले पाहिजे, असे सांगत झिरवाळ यांनी आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच असेही म्हटले आहे.