महाराष्ट्र-कर्नाटक भाषावाद चिघळला ; मनसेने कणेरीमठावर फाडले कन्नड भाषेतील फलक, शिवसेनाही आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गोकुळ शिरगाव :- ‘महाराष्ट्र सरकारने कन्नड सक्तीबाबत तातडीने लक्ष घालावे. एवढे सगळे होत असताना महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री, मुख्यमंत्री गप्प का बसले आहेत.’
कणेरीमठ (ता.करवीर) येथे शेतकरी संमेलनासाठी लावलेले कन्नड (Kannada Board) भाषेतील फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडून जाळले. यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ग्रामस्थ आणि मनसे (MNS) वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली.
महाराष्ट्र आणि कर्नाटकतील शेतकरी बांधवांसाठी कणेरी मठावर (Kaneri Math) शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासंदर्भात दिशादर्शक आणि माहिती देणारे फलक जाजल पेट्रोल पंप ते कणेरी मठापर्यंत आणि कणेरी फाटा ते कणेरी मठापर्यंत लावण्यात आले होते. हे फलक कन्नड भाषेत असल्याने मनसेने ते फाडून टाकले.
याप्रकरणी राजू जाधव, बबन सावरे, आणि सुरेंद्र तिळवेरा यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.दरम्यान, शिवसैनिकांनीही कन्नड सक्ती दूर करण्याची मागणी करीत आक्रमक भूमिका घेत उपनेते संजय पवार व सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल, गोकुळ शिरगाव परिसरात लावलेले कन्नड बोर्ड उखडून टाकले. कर्नाटक सरकारच्या आणि कन्नड संघटनांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
‘महाराष्ट्र सरकारने कन्नड सक्तीबाबत तातडीने लक्ष घालावे. एवढे सगळे होत असताना महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री, मुख्यमंत्री गप्प का बसले आहेत. मराठीवर त्यांचे खरे प्रेम असेल, तर त्यांनी यात तातडीने लक्ष घालावे. महाराष्ट्रातील कन्नड बोर्ड काढण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रशासनांना, जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी संजय पवार यांनी यावेळी केली आहे.