2 हजार गाढवं, मेंढरं घेऊन 20 जानेवारीला मुंबईत धडकणार; ओबीसी नेत्याचा सरकारला इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य सरकारने मराठा समाजाप्रमाणेच ओबीसींना निधी द्यावा, तसेच तातडीने जातनिहाय जनगणना करावी, असे न केल्यास येत्या २० जानेवारीला 2 हजार गाढवं, डुकरं, मेंढरं घेऊन आम्ही मुंबईत येऊन आंदोलन करू, असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नांदेडच्या (Nanded News) नसरी परिसरात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला हजारो ओबीसी बांधवांसह शेंडगे यांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते, या कार्यक्रमानंतर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
काय म्हणाले प्रकाश शेंडगे?
नांदेडच्या सभेच्या निमित्ताने ओबीसी आणि दलित समाज एकत्र आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिलं आहे. त्यांचे रक्ताचे वारसदार म्हणून आरक्षण वाचवण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांची आहे, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला ज्याप्रमाणे सरकारने निधी दिला. तसाच निधी ओबीसींना देखील द्यावा, तसेच तातडीने जातिनिहाय जनगणना करावी, असे न केल्यास येत्या २० जानेवारीला 2 हजार गाढवं, डुकरं, मेंढरं घेऊन आम्ही मुंबईत येऊन मोठं आंदोलन करू, असा इशाराच शेंडगे यांनी सरकारला दिला.
घटनेच्या ३४० कलमानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं आहे. आज तेच आरक्षण या महाराष्ट्रातील सत्ताधारी, धनदांडगा समाज हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही शेंडगे यांनी केला. २० तारखेला मुंबईत होणाऱ्या ओबीसी आंदोलनात प्रकाश आंबेडकर नक्की सहभागी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.