तर तुमचे मराठी म्हणून अस्तित्व संपणार :- राज ठाकरेंचा इशारा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- इतर भाषेतील विशेषत: दक्षिण भारतातील कलाकार एकमेकांना आदराने हाक मारतात. आदबीने वागतात. त्यामुळे त्यांचा देशभरात नावलौकिक होतो; मात्र मराठी कलाकार एकमेकांना आदराने हाक मारत नाहीत.
मंक्या, पॅडी, मामा किंवा टोपण नावाने सर्वांसमोर एकेरीत हाक मारतात. कलाकारच एकमेकांना मान देत नसतील, तर, त्यांचा प्रेक्षक कसा मान राखणार. त्यामुळे देशपातळीवर मराठी कलाकार सुपरस्टार म्हणून चमकत नाहीत. त्यांनी प्रथम एकमेकांचा आदर करायला शिकले पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना दिला.
केशवनगर, चिंचवड येथे सुरू असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी (दि.7) राज ठाकरे यांची ‘नाटक आणि मी’ या विषयावर अभिनेते दीपक करंजीकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नाटकांवर सेन्सॉरशीप लावण्याची गरज नाही. सर्वांच्या हातात असलेल्या मोबाईलवर ओटीटीवरील ऑनलाईन चित्रपट पाहिले जातात. प्रथम मोबाईलवर सेन्सॉरशीप लावावी. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अभिनेते प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, शहर कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
मी शरद पवारसाहेबांना वाकून नमस्कार करेन
नाट्य संमेलनाच्या या व्यासपीठावर आता शरद पवार साहेब आले तर, मी त्यांना वाकून नमस्कार करेन. ते माझ्या महाराष्ट्रातील मोठे बुजूर्ग नेते आहेत. व्यासपीठावर राजकीय बोलणे हा विषय वेगळा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मराठी कलाकारांनी एकमेकांचा आदर राखवा, अशी विनंतीही त्यांनी केली.
लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक काढणार
गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या गाण्यांसंदर्भातील पुस्तक मी तयार करीत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ लता दीदींना दाखवले होते. त्यांनी ‘व्वा’ म्हणून पाठ थोपटली होती. आता त्या आपल्यात नाहीत. लेखक व गीतकार पूर्वी उर्दू भाषेत लिहित. अनेकांची अक्षरे समज नसत. त्यामुळे लता दीदी ती गीत रचना स्वत: मराठीत आपल्या हस्ताक्षरात लिहत. त्यातील बारकावेही त्यात नमूद करत. तो त्यांच्या हस्तलिखिताचा अनमोल खजिना पुस्तक रूपात लवकरच लोकांसमोर आणत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
इतिहास हा भूगोलावर अंवलबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. पूर्वी युद्ध करून जागेवर ताबा घेत. आता चलाखीने जागा विकत घेतली जाते. तुमच्याकडे स्वत:च्या मालकीची जागा नसेल. तुमची भाषा जाऊन दुसरी भाषा आली तर, तुमचे मराठी म्हणून अस्तित्व संपणार आहे. महाराष्ट्रात हा धोका वाढत आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले की, मागे असलेले राज्यपाल यांनी गुजराती व मारवाडी लोकांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाल्याचे वक्तव्य केले होते.
महाराष्ट्र पूर्वीपासूनच सुजलाम सुफलाम आहे. ते दुसर्या राज्यातून महाराष्ट्रात का आले, असे त्यांना विचारले पाहिजे. ढोकळा खाऊन दोन तासात परत येण्यासाठी कोट्यवधींच्या खर्च करून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बनविली जात आहे का, अशी टीका त्यांनी केली. कोणतेही सरकार हे कायम स्वरूपी नसते. चूक केली की लोकांनी शिक्षा केली पाहिजे. सरकारची नाटके आपण पाहत आहोत. साखर कारखान्यांवर तब्बल 5 हजार कोटी खर्च केला जातो. मग, नाट्य क्षेत्रासाठी 500 कोटींचा खर्च केल्यास बिघडत नाही, अशी सूचना त्यांनी मांडली.
जातीपातीच्या फालतू गोष्टी
भारताला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र राज्याने केले आहे. सध्या महाराष्ट्राला जातीपातीच्या फालतू गोष्टीत अडकले जात आहे. हे कोणी तरी घडवत आहे. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून कोणीतरी हे प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहे. त्याला राजकीय पक्ष, नेते, चॅनेल, सोशल मीडिया खतपाणी घालत असल्याचा संशय आहे.