अनिल परब यांनी कोणाला वाहिली श्रद्धांजली, विधान परिषदेत गदारोळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधान परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगळाच प्रयोग केला. त्यामुळे कृषी मंत्री संतापले, परब यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बाकावरील सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघांतील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. या क्रमात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांना बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी शेतकऱ्यांप्रती सरकार किती असंवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी सभागृहातील सदस्यांना एक मिनिट उभे राहण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे उभे राहतील, असे परब म्हणाले. त्यामुळे विरोधी बाकावरील सदस्य उभे राहिले. याला सभागृहात उपस्थित कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला.
एक कोटी सत्तावन लाख शेतकरी खातेदार असून ते जीवित आहेत. त्यांना अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे हे कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. त्याला परब यांनी विरोध केला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. अशातच तालिका सभापतींनी कामकाज स्थगित केले.