उद्धव ठाकरे यांचा पेच सुटला ; भाजपला विधानपरिषदेच्या तीन जागा निश्चित, खडसे,बावनकुळे, तावडे पंकजा मुंडे शर्यतीत
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
यवतमाळ / प्रतिनिधी
कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 21 तारखेलाच मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत.आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे.
भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.
उद्धव ठाकरेंचा पेच सुटला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी कोणत्याही एका सभागृहावर नियुक्त होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु होते. उद्धव ठाकरे यांचं नाव राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही पाठवण्यात आलं आहे. मात्र राज्यपालांनी त्याबाबत अद्याप निर्णय न घेता, त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं.
कोणत्या जागांसाठी निवडणूक
24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.