शिवसेनेची स्थापना कशी झाली, शिवसेना हे नाव कुणी दिले…? जाणून जडण घडणीचा इतिहास…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी आणि हिंदुत्त्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती.
अनेक राजकीय वादळं आणि आव्हानांचा सामना करत शिवसेना (Shiv Sena) आज 57 वर्षांची झाली आहे. शिवसेनेने गेल्या साडेपाच दशकांत एक प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या राजकारणात ठसा उमटवला आहे. मात्र, शिवसेना अंतर्गत वादामुळे दोन गटात दुभंगली आहे. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत.
शिवसेना पक्षाची स्थापना कशी झाली, पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव कुणी दिलं? अशी तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नाची उत्तर आणि शिवसेनेच्या जडण घडणीचा इतिहास आम्ही सांगणार आहोत.
‘मार्मिक’मध्ये शिवसेनेची बीजे रुजली गेली…
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’मधील नोकरी सोडून सन 1960 मध्ये स्वत:चे ‘मार्मिक’ साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) सुरू केले. साप्ताहिकासाठी ‘मार्मिक’ हे नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. विशेष म्हणजे मार्मिकच्या माध्यमातूनच शिवसेनेच्या जन्माची बीजे रुजली गेली, असं म्हणता येईल.
‘वाचा आणि थंड बसा’, हे बाळासाहेब यांचे सदर प्रचंड गाजले होते. तुझ्या डोक्यात पक्षाबाबत, संघटनेबाबत काही विचार सुरू आहे का? असे प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब यांना प्रश्न केला होता. लोक येणार-जाणार, असे किती दिवस चालणार..? लोकांच्या आवाजाला एकत्रित संघटित रूप कधी देणार? प्रबोधनकरांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ होते.
अशी झाली शिवसेनेची स्थापना…
लोकआग्रहास्तव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करणारी संघटना काढण्याचा निर्धार पक्का केला. प्रबोधनकारांनी शिवाजीची सेना… शिवसेना असे नाव सुचवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या केवळ नामोल्लेखाने मराठी माणसांच्या मनात स्फुरण चढते, हे प्रबोधनकारांना ठावूक होते.
‘मार्मिक’च्या 19 जून 1966 अंकात ‘तरुणांची संघटना शिवसेना’ स्थापन करण्यात येत असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या घरातील लोकांच्या व निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेना उद्घाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी केवळ अठरा जण उपस्थित होते. त्यामध्ये ठाकरे कुटुंबीयातील चौघे स्वतः बाळ ठाकरे आणि त्यांचे दोन बंधू व प्रबोधनकार ठाकरे हजर होते. प्रबोधनकार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा उद्घोष करीत शिवसेना स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली.
शिवसेनेने 1967 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढील वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा महाराष्ट्रभर सुरू झाल्या. आपले प्रश्न सोडवण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून लोक शिवसेनेकडे पाहू लागले.
सन 1995 साली शिवसेना आणि भाजप युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. मनोहर जोशी हे शिवसेने पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी ठाणेदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाला सुरुंग लावला. उद्धव ठाकरे यांना धक्का देत संपूर्ण शिवसेनाच खिळखिळी केली. आता वाद सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे.
शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे
शिवसेनेतील अभूतपूर्व बंडखोरीनंतर यंदा शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे. उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को मैदानावर रात्री 8 वाजता वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण करणार आहेत.