यवतमाळ-वाशीम मतदारसंघावरचा दावा कॉंग्रेस सोडणार नाही…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा आहेच. कारण या मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेनेच्या भावना गवळी शिवसेना सोडून गेल्यानंतर आता येथे भक्कम स्थितीमध्ये फक्त कॉंग्रेसच आहे.
त्यामुळे या मतदारसंघावर आमचा दावा आहेच, असे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले.
ठाकरे आज (ता. १२) सकाळी एका वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाले की, या मतदारसंघावरील दावा आम्ही आता सोडणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यावर अन्याय झाला नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले, यावर मी बोलणं योग्य राहणार नाही. कारण हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.
शरद पवारांना सर्व राजकीय परिस्थितीची जाणीव आहे आणि त्याच परिस्थितीप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असावा. त्यामध्ये मी किंवा अन्य कुणी बोलणं योग्य होणार नाही, असे ठाकरे म्हणाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रीय झाले आहेत.
त्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. याबाबत ठाकरे म्हणाले, मला याबद्दल फारशी माहिती नाही. कारण माझ्याकडे दुसऱ्या राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे येथे कोण कुठे जातंय आणि काय करतंय, याची फार माहिती माझ्याकडे नाही.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून माझ्यापूर्वी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनीही निवडणूक लढवली होती. आम्हा दोघांचाही फार कमी मतांनी तेथे पराभव झाला होता. पण यवतमाळ-वाशीम असो किंवा नांदेड असो, या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेसला मतदार करणारे लोक आहेत. आता उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय पक्ष घेत असतो. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, असे त्यांनी येथून युवा नेत्याला संधी मिळणार का, या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
महाविकास आघाडीमध्ये असूनही महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकांच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत आहेत. याबाबत विचारले असता, प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सर्व नेत्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर ते निर्णय घेतील की, एकटे लढायचे की महाविकास आघाडीमध्ये आणि प्रदेश कॉंग्रेस कमिटीसमोर तो निर्णय ठेवतील. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे ठाकरे म्हणाले.
पक्षाने आपल्या हिताच्या दृष्टीकोणातून काय निर्णय घ्यायचा, हा त्या-त्या पक्षाचा अधिकार आहे. सर्व परिस्थितीचा सारासार विचार करून निर्णय घेतले जातात. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिन्ही पक्ष हा विचार करून निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ’ला कुठेही तडा जाईल, असे वाटत नाही, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.