पवारांच्या राजकीय वारसदार सुप्रिया सुळेच…! काका-पुतण्यातील बेबनाव अखेर उघड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पंचविसाव्या वर्धापनदिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघटनेत महत्त्वाचे फेरबदल केले. भाकरी फिरवीत असताना, शरद पवार यांनी आपल्या कन्या खा.सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती करताना आपला राजकीय वारसदार म्हणून खा. सुळे यांच्याच पारड्यात आपले वजन टाकले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गेल्या काही वर्षांपासून अंतर वाढत चालले होते. आता मात्र काका-पुतण्यातील हा बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.
पहाटेपूर्वीच्या शपथविधी प्रकरणात अजित पवार यांनी वेगळा रस्ता पकडण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, शरद पवारांनी मुत्सद्दीपणाने त्यांची कोंडी केली. पक्ष आणि कुटुंब यांचा प्रमुख मीच आहे, असे स्पष्ट करीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्यामागे जाणार्यांना योग्य तो संदेश दिला. अजित पवार यांना एकाकी पाडले. त्यांना घरवापसीशिवाय पर्यायच राहिला नाही. (NCP)
अलीकडेही अजित पवार काही काळ अचानक गायब झाले होते. पण त्यांचे जे काही मनसुबे होते ते काही ते वास्तवात उतरवू शकले नाहीत. यापूर्वीही पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद देताना विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी दिली होती आणि अजित पवारांना डावलले होते. सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्याबरोबर पक्षाच्या इतर मंत्र्यांनीही राजीनामे दिले. पण शरद पवारांनी अजित पवार यांचा एकट्याचा राजीनामा मंजूर केला. त्यांचा हा संदेश उघडच होता.
मावळसारख्या तुलनेने राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेल्या लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला, तेव्हाच काका-पुतण्यातील दुरावा उघड झाला होता. गेल्या महिन्यातच शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली तेव्हाच त्यांनी आजच्या निर्णयाची तयारी केली असणार, असे म्हणता येईल. त्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी ‘दादा, दादा’ असा आवाज दिला, तेव्हा त्यांना सुप्रिया सुळे यांनी फटकारले होते. आजच्या नवी दिल्लीच्या बैठकीत काय होणार, याची बहुधा अजित पवारांना कल्पना असावी. बैठक संपताच ते तातडीने बाहेर पडले. बैठकीतही ते विमनस्कपणे बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्या मन:स्थितीची कल्पना येऊ शकते.
पवार यांची भीती
अजित पवार हे आक्रमक आहेत. आर्थिकसह अनेक बाबींनी समर्थ आहेत. त्यामुळे पक्षात त्यांना महत्त्वाचे पद दिल्यास कालांतराने साराच पक्ष ताब्यात घेतील, अशी साधार भीती शरद पवार यांना वाटली असेल; तर ती अस्थानी मानता येणार नाही. शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रासह आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील साम्राज्यही मोठे आहे. अजित पवारांनी पक्ष कब्जात घेतला तर ते या साम्राज्यातही चंचुप्रवेश करतील, अशीही भीती त्यांना भेडसावत असली, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही.
सुप्रिया सुळे यांच्याकडे सर्व सूत्रे
आता शरद पवार यांनी आपले सहकारी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपद दिले आहे. सुप्रिया सुळे यांनाही तेच पद दिले आहे. पण तसे पद देताना त्यांनी सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे सर्वाधिकार दिले आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेर राष्ट्रवादी काँगे्रसचे अस्तित्व अगदी नगण्य आहे. स्वाभाविकच पक्षाची सारी आणि खरी सूत्रे सुप्रिया यांच्याच हाती आली आहेत. या नव्या परिस्थितीत अजित पवार काय करणार, जुळवून घेणार की वेगळे काही करणार, हा आता कळीचा मुद्दा ठरणार आहे.