सत्ता संघर्षाच्या कारवाईस वेग, राहुल नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्ता संघर्षाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल दिला.
या निकालाची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
शिवसेना मूळ पक्ष कोणाचा आणि शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांनी या निर्णयाबाबत पावलं उचलायला सुरुवात केली आहे. नार्वेकरांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधिमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईस वेग आल्याचं दिसतं आहे.
विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल लवकरात लवकर द्यावा असं उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, राहुल नार्वेकर निकालासाठी कितीही वेळ घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे, असं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान सगळ्यांचं लक्ष अध्यक्षांच्या निर्णयाकडं लागलं आहे.
“सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणेच मी वेळेत निर्णय घेणार आहे. मात्र, तो कालावधी किती दिवसांचा असेल हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तो लागणारच आहे. मात्र, निर्णय जाहीर करण्यात उशीर केला जाणार नाही,” असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.