शिंदे गटाला हव्यात २२ जागा ; कोणतीही मागणी नसल्याचा फडणवीसांचा दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा सुरु असतानाच सत्ताधारी युतीतील शिवसेनेने (शिंदे गट) आम्ही २२ जागा लढवणार, अशी घोषणा केली आहे. भाजप आणि शिवसेना या दोघांची युती जुनी आहे.
पूर्वीप्रमाणेच २८ जागा ते आणि २२ जागा आम्ही लढू, असे खासदार राहुल शेवाळे यांनी घोषित केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली. आम्ही नेहमीप्रमाणेच २२ जागा लढवू , असे या बैठकीत ठरल्याचे शेवाळे म्हणाले. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
मात्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसभा निवडणुकीला वेळ आहे. आम्ही कायम भाजपबरोबर आहोत. कुणी किती जागा लढायच्या हा मुद्दा गैरलागू आहे,’ असे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणीही नाराज नाही. कुणी कोणतीही मागणी केली नसल्याचे सांगितले.
भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दोन्ही पक्षात कोणताही वाद नाही. आमचे लक्ष्य जागावाटप नाही तर जनतेची सेवा करणे आहे,’ असे सांगितले. कोण किती जागा लढवणार हे प्रश्न वरिष्ठांच्या कक्षेतले आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून सापत्न वागणूक : किर्तीकर
शिवसेना हा भाजपचा सहकारी पक्ष आहे. आमची अनेक वर्षांपासून युती आहे .मात्र तरीही आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे. आमची कामे होत नाहीत, असा तक्रारीचा सूर खासदार (शिंदे गट) गजानन किर्तीकर यांनी लावला आहे .या मागची नेमकी कारणे मात्र त्यांनी स्पष्ट केलेली नाहीत.