राज्यातील वाघाच्या संख्येत २३ टक्क्यांनी वाढ ; चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाघ…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशात ३ हजार १६७ वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आता महाराष्ट्रात ४४६ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील वाघाच्या संख्येत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, राज्यात सर्वाधिक २०६ ते २४८ वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
भारतीय वन्यजीव संस्था व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने गणना केलेली आकडेवारी नुकतीच पंतप्रधानांनी जाहीर केली. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ असल्याच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रात तब्बल ४४६ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. राज्यातील ४४६ वाघांपैकी तब्बल २०६ ते २४८ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. यामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१, ब्रम्हपुरी वनविभागात ५३ ते ६६, मध्य चांदा वनविभागात १०, वरोरा-भद्रावती वनक्षेत्रात १३, राजुरा विभागात २, प्रस्तावित कन्हाळगाव अभयारण्यात १३ ते २३, जुनोना वनक्षेत्रात २६ ते ४३ वाघ आहेत.
वाघासाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास
६२५ चौ कि.मी. वनक्षेत्रात असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघासाठी सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास आहे. तसेच वाघाच्या शिकारीसाठी मोठ्या संख्येने तृष्णभक्षक प्राणी ताडोबात आहे. त्यामुळे एकट्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ८७ ते ९१ वाघ आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील उष्ण वातावरणामुळे प्रजनन क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
स्थलांतरण करणे आवश्यक
मानव-वन्यजीव संघर्ष व वाघाच्या झुंजीत वाढ, वाघाच्या संख्येत झालेली वाढ, अपुरे अधिवास क्षेत्र यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष व दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वाघाच्या मृत्यूचे प्रमाण कमी करावयाचे असले तर, वाघाचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे, असे जाणकार सांगतात.