मराठवाडय़ात भारत राष्ट्र समितीला बळ, २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चंद्रशेखर राव यांची सभा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर : शेतीच्या प्रश्नांभोवती मतपेढी तयार करण्याचे मनसुबे घेऊन तेलंगणामधून पाय पसरू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला आता मराठवाडय़ात आकार येऊ लागला आहे. शेतकरी संघटनेतील काही कार्यकर्ते, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले अनेक नेते चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असून ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश करत आहेत.
मिळणारा प्रतिसाद आणि उत्साह वाढविण्यासाठी २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ‘ बीआरएस’च्या जाहीर सभेचे आमखास मैदानात आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण करत ट्रॅक्टर चिन्हासह आपला प्रभाव निर्माण करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षे काम करणारे कदीर मौलना तसेच गंगापूर मतदारसंघातील अण्णासाहेब माने यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना बरोबर घेत सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेस चंद्रशेखर राव मार्गदर्शन करणार आहेत. सीमावर्ती भागातील काही नेते भारत राष्ट्र समितीच्या हाती लागतील असे मानले जात होते. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे शंकर अण्णा धोंडगे, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणारे यशपाल भिंगे यांच्यासह शेतकरी संघटनेतील नेत्यांना या पक्षाचे वेध लागले. त्यांनी ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश घेतला.
ज्या जिल्ह्यात राजकीय अस्वस्थता अधिक त्या जिल्ह्यात या पक्षाला पाय पसरविणे सहज शक्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक लढविण्यास इच्छुक पण यश न मिळालेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण् सेना, शिवसेना असा प्रवास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करून पाहिले. मात्र, ठाकरे गटाचा काही प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नव्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. रायभान जाधव आघाडी करून स्वत:चे राजकीय अस्तित्व जपत व पक्षीय बळ मिळविणारे हर्षवर्धन जाधव हे नेहमी चर्चेत असतात. कदीर मौलना हे राष्ट्रवादीमध्ये नाराज होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावरील नाराज गटाचे ते नेतृत्व करत होते. गंगापूर मतदारसंघात पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी बांधणी करण्यास सुरुवात केल्यानंतर अण्णासाहेब माने यांनाही पक्ष बदलण्याची गरज भासू लागली होती. त्यांनीही चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश केला.