ठाकरे सरकारचा ९०० कोटींचा घोटाळा :- किरीट सोमय्यांचा आरोप…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वीच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजप नेत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेने (BMC) दहिसरमध्ये ९०० कोटी रुपयांचा जमी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
सोमय्यांच्या या आरोपामुळे भाजप आणि ठाकरे गटातील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी सोमय्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सत्तेवर आल्यानंतर ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने दहिसरमधील ९०० कोटींची जमीन एका बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपुर्वी निशल्प रिऍलिटीने दहिसर येथील ७ एकर जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव मांडला होता,पण तो स्वीकारला गेला नव्हता. या जागेवर १०० टक्के अतिक्रमणे आहेत.
मुंबई महानगरपालिकेने १० वर्षे या जमिनीच्या खरेदीचा प्रस्ताव फेटाळून लावला. या जमिनीची किंमत १५ कोटी रुपयेदेखील नाही. पण सत्तेवर येताच ठाकरे सरकारने ३५४ कोटी रुपये रोख रक्कम देऊन हा भूखंड खरेदी करण्यात आला. आता बिल्डर पुन्हा साडेपाचशे कोटी रुपये मागतोय, असा ९०० कोटी रुपयांचा घोटाळा ठाकरे सरकारने केल्याचा आरोप, किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
” महापालिकेचे त्यावेळचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महापालिकेच्या सुधार समितीला पत्राद्वारे जमिनीचा ताबा घेण्यास स्पष्ट विरोध केला. त्यानंतर महापालिकेच्या सुधार समितीने परदेशी यांच्याकडे या भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव मांडला, पण परदेशी यांनी तो फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर निशल्प रिऍलिटीने मांडलेला हा प्रस्ताव अव्यवहार्य असून तो फेटाळणे का आवश्यक आहे, यावरही सविस्तर टिप्पण्णी दिली होती.
“या भूखंडाची किंमत ५४ कोटीच्या आसपास असल्याचे परदेशी यांनी सांगितलं होतं. तसेच सूचनापत्रकात, कोणत्याही अडचणीविना अशा कोणत्याही जागेचा ताबा मिळाला पाहिजे, असे मत नोंदविले होते.शिवाय या भूखंड खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ३५४ कोटी रुपयांवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अस असतानाही ठाकरे सरकारकडून महापालिकेच्या वित्त विभागाला या भूखंडाच्या खरेदीसाठी ३४९ कोटी, १४ लाख १९ हजार १३ रुपये इतकी रक्कम तातडीने देण्याची सूचना दिली.बिल्डरला अनामत रक्कम म्हणून ५४ कोटी रुपयांचा अगोदरच देण्यात आले होते. त्यानंतर २९४ कोटी रुपयांचा मोबदला निशल्प रिऍलिटीला देण्यात आला. आता तो पुन्हा ५५० कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप सोमैय्यांनी केला आहे.