गिरीश महाजन आणि छगन भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमान प्रवास केलाय.
या दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे आता राजकीय क्षेत्रात चर्चा रंगू लागल्या आहेत. परंतु यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भुजबळ आणि त्यांच्यासह प्रवासाचा योगायोग असल्याचं म्हटलं आहे.
“आमचा एकत्र प्रवास म्हणजे निव्वळ एक योगायोग होता,” असं सांगताना मंत्री महाजन यांनी यावेळी राष्ट्रवादीला खोचक टोला देखील लगावला आहे. “भाजपच्या विरोधकांना रोज पंतप्रधान होण्याचे तर काहींना मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत असतात. त्यातून ते एकमेकांना शुभेच्छा देण्यात व्यस्त असतात. परंतु हे पद मिळवण्यासाठी आधी आमदार, खासदार निवडून आणवे लागतात, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
‘असा’ झाला एकत्र विमान प्रवास
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये देखील गारपिटीने शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी तातडीने लातूर आणि नांदेड दौऱ्यावर जायचे होते. दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी लातूरला येणार असल्याचे कळल्यानंतर मंत्री महाजनही त्याच विमानाने आले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने एकमेका साह्य करू अशी चर्चा रंगली आहे.
अवकाळी पावसाने उभी पिके जमीनदोस्त
सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. तर काही भागात गारपीट झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. कुठे ज्वारी, गहू, हरभरा तर कुठे द्राक्ष, आंबा, केळी या बागांचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.
दरम्यान, “राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.