कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांची वीज तोडणी ; शेतकरी आक्रमक ; महावितरण सह तहसीलदारांना घेराव ; आमदारांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर शेतकऱ्यांचा आरोप
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महावितरण कंपनीच्या मनमानी धोरणाचा शेतकरी बळी ठरतोय. थकबाकी वीजबिल भरण्याची कोणतीही पूर्वसूचना न देता शेतातील वीज पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. त्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले.त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणसह तहसीलदारांना घेराव घालत महावितरण कंपनीविरोधात रोष व्यक्त केला.
यवतमाळ जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्यात महागाव तालुक्यातील कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रब्बी पीकही अंतिम टप्यात आहे. शासनाकडून थकबाकी वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज तोडणी न करण्याचे आदेश देण्यात आले होते.परंतु अचानक मागील ३ दिवसापासून शेतातील वीजबिल भरण्याची कोणतेही पूर्वसूचना न देता महागाव वीज वितरण उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या थकीत वीजपुरवठा शेती पंपाची वीज तोडणी करण्यात आहे. शेतकरी आक्रमक झाले.तब्बल दीडशेच्या वर शेतकऱ्यांनी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष ( ठाकरे गट ) प्रमोद भरवाडे , जन जन आंदोलन आधार संघर्ष आधार समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे , शेतकरी नेते गोविंदराव देशमुख , गजानन पाटील नरवाडे , यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेतकऱ्यांसह महावितरणला घेराव घातला. वर्तमान समस्या मांडली. वीज बिल भरण्याची कोणतेही पूर्वसूचना न देता वीज तोडणी कोण्या आधारे केली याचा जाब विचारला.मात्र महावितरण अधिकारी अनुत्तरित झाल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले. वीज बिल भरण्याची शेतकऱ्यांनी सध्या स्थिती नाही.आगामी उन्हाळ्याची चाहूल असल्याने विद्युत पुरवठा खंडित असल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत.गहू पीक अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
वीज तोडणी ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयात वळवला . तहसिलदार आणि नायब तहसीलदार यांना घेराव घातला.वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी तहसीलदार विश्वंभर राणे , यांनी कार्यकारी अभियंता आडे , उपकार्यकारी अधिकारी विनोद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांची मध्यस्थी केली. त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना काही अलिखित अटी व शर्तीवर वीज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी सुखावले.
आमदारांनी शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर :
शेतकऱ्यांना विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले असून शेतकऱ्यांचा फोन उचलण्यास आमदारांनी असमर्थत दाखवली. शेतकऱ्यांच्या पाठीशी आमदार नसतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा.
गजानन पाटील नरवाडे
प्रगतशिल शेतकरी
शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची : गोविंदराव देशमुख
महावितरण च्या मनमानी धोरणाने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांची एकजूट दिसून आली. महावितरण विरोधात केलेले आंदोलन हे केवळ एक ट्रेलर आहे. महावितरण ने शेतकऱ्यानं प्रती कारभार सुधारला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अशीच शेतकऱ्यांनी एकजूट महत्त्वाची आहे.अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते गोविंदराव देशमुख यांनी बोलताना सांगितले.
विज बिल भरल्यानंतर वीज जोडणी करू : उपकार्यकारी अभियंता
बऱ्याच दिवसांनी ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही.त्यांच्या वीज पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची वेळोवेळी संधी देण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे.त्या शेतकऱ्यांनी विज बिल भरल्या नंतर विज जोडणी तात्काळ करू देण्यात येईल. अशी माहिती उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांनी दिली.