विजयानंतर कोणाला देणार पाठिंबा..? सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नाशिक :- नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
त्यांनी प्रतिस्पर्धी ठाकरे गट तसेच माहाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. काँग्रेसशी मतभेद झाल्यानंतर तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता सत्यजीत तांबे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानाला येऊ शकली नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मतं आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे लोक आम्हाला मदत करत असतात, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मनं जिंकण्याचं काम केलं. हाच ऋणानुबंध पुढे नेण्याचं काम मी करेन. सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत मी ४ तारखेला माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं, असंही तांबे म्हणाले.