भाजपची झोप उडणार, लोकसभा निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं भाकित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात लोकसभेसाठी भाजपला १४ तर मविआला ३४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे.
भाजपचे अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिंदे गटाला मोठा धक्का मानल्या जात आहे. तसेच ठाकरे गटाची ताकद वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाचे दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हिरे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया टीव्ही-सी व्होटरच्या सर्व्हेवर भाष्य केले.
“लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. महिन्याभरात मालेगावात सभा घेऊ. आज जो सर्वे प्रसिद्ध झाला त्यात आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडील ३४ जागा मिळणार असल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र सर्व एकत्र लढलो तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील. जनतेनं ठरवलं तर ४८ जागा देखील महाविकास आघाडी जिंकेल”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भाजपची प्रतिक्रिया –
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्ही सर्वेच्या आधारे कधीच राजकारण करत नाही वस्तुस्थितीवर आधारीत राजकारण करतो. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये सी-व्होटरचे सर्वे आले होते ते आपल्या समोर आहेत. मी दाव्यानं सांगतो की, उद्या जरी निवडणुका झाल्या तरी ५१ टक्के मत घेऊन भाजप ४४ प्लस झाल्याशिवाय राहणार नाही”