देवेंद्र फडणवीसांच्या ‘सनातन धर्म की जय’ घोषणेने नवा वाद; शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सिकंदर शेखवर झालेल्या अन्यायाच्या चर्चेच्या वादाची किनार लागली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र केसरी मैदानातील आणखी एका गोष्टीने नवा वाद निर्माण झाला आहे.
खेळाच्या मैदानात फडणवीस यांनी ‘सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा काल, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्कार केला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत मोदीबागेत भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील समारोपाच्या भाषणात ‘सनातन धर्म की जय’ अशी घोषणा दिली. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र केसरीच्या मैदानात फडणवीस यांच्याकडून पैलवानांच्या मानधन वाढीची घोषणा झाली त्याचं स्वागतच आहे. पण तुम्ही म्हणता तसं कुणाची जय वैगरेची घोषणा झाली असेल तर ते अयोग्य आहे’, अशा शब्दात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली
शरद पवार यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा देखील खरपूस समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान गृहस्थ आहे. त्यांचे घर कोल्हापूरला आणि ते निवडणूक कोथरूडमधून लढले. त्यांना त्यांचं गाव सोडून कोथरूडमध्ये यावं लागलं. त्यांचं कोथरूड मध्ये काय योगदान? त्यांच्यावर काय भाष्य करावं?, असा जोरदार घणाघात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.