हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी ; केंद्राकडून मोठा निर्णय जाहीर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पवित्र हज यात्रेमधील व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता हज यात्रेसाठीचा ‘व्हीआयपी’ कोटाच रद्द केला आहे.
यानुसार राखीव ठेवण्यात येणाऱया जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेची पर्वणी साधता येईल आहे.
भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अल्पसंख्याक मंत्री तसेच हज समितीचे सदस्य यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणाऱ्या जवळपास सर्व व्हीआयपी कोट्याच्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सर्व सामान्य यात्रेकरूंप्रमाणे हजमध्ये सहभागी होतील. कोणासाठीही ‘विशेष व्यवस्था’ किंवा आरक्षण असणार नाही.
यंदाची यात्रा निर्बंधमुक्त
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. कोरोनामुळे प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानेही जगभरातील देशांसाठी प्रवाशांचा कोटाही कमी केला होता.
मात्र आता २०२३ च्या हज यात्रेत कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. यंदा ७० वर्षांवरील यात्रेकरूंनाही हजला जाता येणार आहे.
भारतातून हज यात्रेला जाणाऱ्यांसाठीचा कोटा सौदी अरेबियाने भारतातील प्रवाशांचा कोटा २५ हजारांनी वाढवून आता दोन लाखांपर्यंत यात्रेकरूंना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा भारतीय मुस्लिम अनुदानाशिवाय हज करू शकतील.
सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भारतीयांसाठीचा कोटा वाढविण्याची घोषणा केली होती. या निर्णयानंतर भारतातील सर्व राज्यांमधून अर्ज केलेल्या बहुतांश लोकांना यात्रेला जाण्याची संधी मिळाली. यापूर्वी हजारो लोकांचे आरक्षण प्रलंबित होते तेही आता मार्गी लागेल.
या निर्णयानंतर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांतील सर्व हज अर्जदार या वर्षी यात्रेला जाऊ शकतील उत्तर प्रदेशातून हज यात्रेसाठी सर्वाधिक यात्रेकरू अर्ज करतात. या एका राज्यातून ३० हजारांहून अधिक लोकांना ‘हज’चा लाभ मिळू शकेल.
जेद्दाह येथे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय कराराचा भाग म्हणून वरील घोषणा करण्यात आली. सौदी अरेबियाचे हज आणि उमराह उपमंत्री डॉ. अदेलफताह बिन सुलेम माश आणि भारताचे महावाणिज्यदूत मोहम्मद शाहिद आलम यांनी जेद्दाह येथील माजी कार्यालयात कोटा वाढविण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
” व्हीआयपी कोटा रद्द करण्यामुळे हज यात्रेकरूंना सुविधाजनक ठरेल असा विश्वास वाटतो. सौदी अरेबियाने भारतीयांचा कोटा वाढविण्याचाही निर्णयही हजारो सर्वसामान्य भारतीय हज यात्रेकरूंना खूप फायदेशीर ठरणार आहे.”
– सईद अंसारी