बच्चू कडू यांनी सरकारविरोधात दंड थोपटले…! विधान परिषदेच्या पाचही जागांवर दिले उमेदवार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गटाची साथ देणाऱयांमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या पाचही जागांवर आपले उमेदवार उभे करत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात दंड थोपटले आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने हे पाऊल आपण उचलले असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतची सगळी कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. या निवडणुकांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मेहनत करतोय. त्यासाठी आम्ही प्रचंड मतदार नोंदणी केली आहे. या निवडणुकीत शिंदे गट, प्रहार आणि भाजपा अशी युती करून उमेदवार द्यावेत, अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे पाचही मतदारसंघात उमेदार उभे करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाने घेतला असल्याचे बच्चू कडू म्हणाले.