‘देवेंद्र फडणवीस भविष्यात मोदींनाही आव्हान देणार,’ सुषमा अंधारेंचा मोठा दावा; चंद्रकांत पाटलांचा संदर्भ देत, म्हणाल्या “त्यांना आजूबाजूला.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत पाटलांविरोधात शाईफेक करून राग व्यक्त करण्यात आला होता..
दरम्यान, याच घटनेचा आधार घेत ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. फडणवीस उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील आव्हान देतील, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“चंद्रकांत पाटील यांचा राजकीय बळी देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांचा कार्यक्रम अगोदरच लागला आहे. शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील कोणावरही गुन्हा दाखल करू नये असे म्हणाले होते. तरीदेखील चंद्रकांत पाटील यांची छबी बिघडवण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात आले. गृहखात्याकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले. गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
“त्यानंतर याच प्रकरणाच्या संबंधाने आम्ही आंबेडकरवाद्यांच्या घरात घुसून मारू असे विधान राम कदम यांनी केले. खरं म्हणजे राम कदम यांना ते शक्य नाही. या विधानामुळे लोक राम कदम यांच्यावर चीडणार नाहीत. तर हा राग चंद्रकांत पाटलांवर असेल. चंद्रकांत पाटलांबद्दलचा राग वाढवण्यासाठी राम कदम यांच्या तोंडी ती स्क्रीप्ट घालण्यात आली. ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कमाल आहे. त्यांच्या बुद्धीचातुर्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे,” अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केली.
“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे मजबूर आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना अडगळीत टाकण्यात आले आहे. विनोद तावडे यांचीही तीच परिस्थिती आहे. चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांचीही अशीच स्थिती आहे. सदाभाऊ खोत यांना तर राजकारणातून हद्दपार करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा तारांकित प्रश्नदेखील भाजपाच्या नेत्याने विचारला. फडणवीस यांना त्यांच्या आजूबाजूला कोणीही राजकीय स्पर्धक नको आहे,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच भविष्यात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनादेखील आव्हान देणार आहेत. त्या आव्हानामुळे मोदी यांना आश्चर्य वाटायला नको, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.