फडणवीस नागपूरऐवजी तातडीने दिल्लीसाठी रवाना : राज्यात चर्चेला उधाण……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
त्यांच्या अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस हे आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (ता. २३ डिसेंबर) पुण्यात आले होते. त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर व इतर भाजप नेते होते. आमदार टिळक यांचे अंतिम दर्शन घेऊन फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याहून थेट तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनावरून वातावरण तापलेले असताना फडणवीस हे नागपूरला येणे अपेक्षित होते. मात्र, ते पुण्याच्या विमानतळावरून थेट दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. नेमकं कोणत्या कारणांसाठी फडणवीस दिल्लीत गेले आहेत, याबाबत राज्यात उत्सुकता आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, असा आरोप विरोधी पक्षाकडून विशेषतः शिवसेनेकडून होतो आहे. कारण, भूखंड गैरव्यवहारसंदर्भात चौकशीची मागणी करणारे एक पत्र भाजप आमदारने लिहिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस हे कोणत्या कारणासाठी दिल्लीला गेले आहेत, याची चर्चा होताना दिसत आहे.
बापटांच्या प्रकृतीची केली विचारपूस
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन तसेच प्रविण दरेकर आणि इतर नेते उपस्थित होते.