ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना भेटवस्तू मिळणार ; जयंत पाटील यांचा टोला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य सरकारची मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी झाली असून ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही, त्यांना भेटवस्तू मिळेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
तसंच निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले, चार लाख लोकांचा रोजगार गेला. तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राच्या सांगण्यावरून गप्प बसले अशी टीकाही पाटील यांनी केली.
सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, गुजरात निवडणुकांमध्ये विजयाची खात्री नसल्यानेच राज्यातले प्रकल्प गुजरातला पळवले. इकडच्या चार लाख लोकांचा रोजगार गेला. पण, केंद्राने बोलू नका, असं सांगितल्यामुळे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली आहे, आता आमचे प्रकल्प आम्हाला परत द्यावेत. निवडणुकीमुळेच कर्नाटकचे वाचाळ मुख्यमंत्री सीमाभागातील गावांबद्दल वक्तव्ये करत आहेत; पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. कारण दोघे आदेश पाळणारे आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.
सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्याच सरकारची जुनी योजना आहे. योजना पारदर्शक कशी होईल, याची जबाबदारी शासनाने घ्यावी. मागच्या जलयुक्त शिवारमध्ये काही त्रुटी राहिल्या, तसे होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पाटील म्हणाले.
हिवाळी अधिवेशनावरही त्यांनी उत्तर देताना पाटील यांनी म्हटलं की, सरकारने दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नाताळच्या सुट्ट्याही येत आहेत. सरकार अधिवेशन लवकर गुंडाळण्याच्या विचारात आहे; परंतु जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडता आले पाहिजेत. यामुळे तीन आठवडे अधिवेशन सुरू राहण्यासाठी आग्रही असल्याचे पाटील यांनी सांगितले.