‘त्या’ चकमकीत भारताचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही, तवांग मुद्द्यावर राजनाथ सिंह यांचे संसदेत उत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे.
या मुद्द्यावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. 9 डिसेंबर रोजी चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला आपल्या देशात परत जावे लागले. ते म्हणाले की, या चकमकीत आमचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी झालेला नाही.
संरक्षण मंत्र्यांचे संसदेत लेखी निवेदन
तवांग चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत बोलत होते. अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी 12 वाजता संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले. ते म्हणाले, “9 डिसेंबर रोजी पीएलएच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात घुसखोरी तसेच अतिक्रमण केले. आमच्या जवानांनी या प्रयत्नाला खंबीरपणे तोंड दिले. आमच्या सैनिकांनी धैर्याने या परिस्थितीचा सामना केला आणि चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले.”
‘भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध” – राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री म्हणाले, “हा मुद्दा चीनकडेही गंभीरतेने उचलला गेला आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच इतर कोणत्याही परिस्थितीला आव्हान देण्याचा प्रयत्न पराभूत करण्यास तयार आहेत. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “या लढाईत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मात्र मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झाला नाही किंवा त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे.”
News Reels
राजनाथ सिंह यांची निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
संरक्षण मंत्री सिंह म्हणाले की, आमच्या एकाही सैनिकाचा मृत्यू झाला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झाले नाही. यापूर्वी राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवेचे प्रमुख एनएसए अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तवांग येथील भारत-चीन संघर्षावर वरिष्ठ मंत्र्यांसोबत संसदेत त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
कॉंग्रेसकडून नोटीस
संसदेचे अधिवेशन आज वादळी ठरण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीचा मुद्दा संसदेत उपस्थित करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. त्यानुसार काँग्रेस खासदार नासिर हुसेन यांनी राज्यसभेत नियम 176 अन्वये चर्चेसाठी नोटीस दिली आहे. तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. 9 डिसेंबरला तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देताना पळवून लावले होते.
9 डिसेंबर रोजी भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या सैन्याचा एक गट सीमा रेषेजवळ दिसला होता. त्यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी सैन्याला माघार घेण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. चकमक झाल्यानंतर लगेचच दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या भागात परतले. चिनी सैनिकांनी अचानक केलेल्या या हल्ल्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून 20 सैनिक जखमी झाले, तर जखमी चिनी सैनिकांची संख्या दुपटीने अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.